पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील गोविंद नगर भागातील राहत्या घरानजीक असलेल्या विहिरीत उडी घेत एका १९ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना दि. १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी विवाहितेस सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत असल्यानेच विवाहितेने आत्महत्या केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवाशी राहुल चव्हाण याचा प्रेमविवाह लिहा तांडा ता. जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक मिळाल्यानंतर काजल हीस आजल सासु सुग्राबाई चव्हाण, सासु मुक्ताबाई चव्हाण, चुलत सासु पार्वतीबाई चव्हाण ह्या किरकोळ कारणावरून टोचून बोलत असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. सतत होणाऱ्या भांडणा मुळे राहुल चव्हाण हा दि. १० जुलै रोजी काजल सोबत पाचोरा येथील गोविंद नगर भागात भाड्याची खोली घेऊन राहायला आला होता.
दरम्यान, १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास काजल घरात दिसून आली नाही. काजल हिने टोकाचे पाऊल उचलत घराच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने काजल हीस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी काजलला मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात काजल हिच्या आईसह माहेरच्या मंडळींनी एकच आक्रोश करत सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून काजलने आत्महत्या केल्याचा आरोप केला. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.