चाळीसगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) अंतर्गत चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील २६ किमीच्या रस्त्यांसाठी २२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळेच आमदार मंगेश चव्हाण (Mla Mangesh Chavhan) यांनी गतिमान केंद्र व राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
अवघ्या दोन महिन्यात निधी मंजूर !
अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारच्या वेळकाढूपणामुळे रखडलेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) च्या कामाला भाजपा – सेना युती सरकारने गती दिली असून अवघ्या दोन महिन्यात केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यासाठी २०३९ कोटींच्या निधीतून २५५१ किमीच्या रस्त्यांना मान्यता मिळाली आहे. त्यात केंद्र शासनाचा १२१८ कोटी व राज्य शासनाचा ८२१ कोटी असा सहभाग असणार आहे.
चाळीसगाव मतदारसंघातील या रस्त्याचा विषय लागणार मार्गी !
चाळीसगाव मतदारसंघातील पातोंडा – वाघडू -रांजणगाव – राष्ट्रीय महामार्ग २११ (१०.४३ किमी) आणि शिंदी – हिरापूर – अंधारी – तमगव्हाण (१५.९४ किमी) या दोन रस्त्यांचा समावेश आहे. त्यातील हिरापूर – अंधारी – तमगव्हाण या रस्त्याला काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पात ६ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याची निविदा देखील निघाली आहे. मात्र सदर रस्त्याची तातडीने सुधारणा होणे गरजेचे असल्याने त्याऐवजी रस्त्याचा पुढील भाग या कामात समाविष्ट करण्यात यावा अशी देखील मी शिफारस शासनाकडे करणार आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी मानले आभार !
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सदर दोन्ही रस्त्यांसाठी २२ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदींचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.