मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील चार दिवस मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
धुवाधार पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. मोजक्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. तर उर्वरित ठिकाणी पावसानं उघडीप घेतली होती. मात्र, अशातच आता हवामान विभागानं उद्यापासून मुसळदार पावासाचा इशारा दिला आहे. राज्यात मुंबईसह कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसानं धुमकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. दुसरीकडं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वरुणराजाने उघडीप दिल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 16 बंधाऱ्यांवर पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. जिल्ह्यातील अजूनही 15 बंधारे पाण्याखाली असले, तरी पाणी वेगाने ओसरत असल्याने ते सुद्धा लवकरच मोकळे होतील, अशी चिन्हे आहेत.