मुंबई (वृत्तसंस्था) योग गुरु बाबा रामदेव यांनी १९ फेब्रुवारीला कोरोनाचे औषध ‘कोरोनिल’ लॉन्च केले होते. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितिन गडकरी उपस्थित होते. हे औषध आता बाजारातही उपलब्ध झाले आहे. पण, महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पतंजलीला मोठा धक्का बसला आहे.
कोरोना संसर्गावरील उपचारासाठी कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता दिली नसल्याचे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच स्पष्ट केल्यामुळे ‘कोरोनिल’ औषधाला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणिकरणानुसार आयुष मंत्रालयाने मान्यता दिल्याचा पतंजली आयुर्वेद कंपनीचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील “सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही.” असं स्पष्ट केलं आहे. ट्वीटच्या माध्यमातून देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर ‘आयएमए’ने प्रश्न उपस्थित केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सुद्धा हे औषध करोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणं आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही,’ असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
‘जागतिक आरोग्य संघटना, आयएमए व इतर संबंधित मान्यताप्राप्त आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय कोरोनील या औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही,’ असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हे औषध आणण्यात आले. सुरुवातीला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे औषध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता ते संपूर्ण कोरोनावर मात करणारे औषध म्हणून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात या औषधाला कुठल्याही अधिकृत संघटनेकडून मान्यता मिळालेली नाही. ती मिळाली असल्यास तसं सिद्ध करावं, अशी मागणी ‘आयएमए’नं केली आहे. ‘हा प्रकार सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा व त्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे. कोरोनाची लस येण्यासाठी इतके महिने लागले असताना हे औषध इतक्या लवकर कसं उपलब्ध झालं? त्याला कुणी मान्यता दिली, असा प्रश्नही ‘आयएमए’नं केला आहे.
















