मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटची आता चौकशी होणार आहे. केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. शेतकरी आंदोलनाबाबत अमेरिकेच्या पॉपस्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर भारतीय सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सनी एक सारखे ट्वीट केले होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. गृहमंत्र्यांनी या ट्वीटबद्दल आदेश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याचं गुप्तहेर विभाग याची चौकशी करणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर टीका केली. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर अनेक कलाकार, खेळाडू यांनी एक सारखे ट्वीट केले होते. यातील शब्द सुद्धा अगदी एकसारखेच होते. या सेलिब्रिटींनी एक सारखे टीव्ट केले का या संदर्भात दबाव नेमका कोणाचा होता का? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सचिव सावंत यांनी केली.
सायना नेहवाल, अक्षयचे ट्विट सारखे कसे?
अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांचे ट्वीट एकसारखेच होते. त्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. गुप्तचर विभागाला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सेलिब्रिटींवर कुणी दबाव आणत असेल तर ते गंभीर आहे, असंही सचिन सावंत यांनी सांगितलं. सचिन सावंत यांच्या मागणीनंतर भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या या भूमिकेवर टीका केली आहे.
सचिन तेंडुलकरने ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही.” बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया. आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पाँप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्या ट्विटची चौकशी करणार असे भयंकर वृत्त आताच समजले, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.