मुंबई (वृत्तसंस्था) मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर टीका होत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आता मनसेनं शंका उपस्थित केल्या आहेत. “सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?,” असे सवाल देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून, या प्रकरणात विरोधकांकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचंही नाव घेतलं जात आहे. यावरून विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधकांकडून ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली जात असतानाच वाझे यांचं नाव घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सरकारला सवाल केला आहे. स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह काल (५ मार्च) मुब्रा रेतीबंदर येथे आढळून आला. या घटनेनंतर अंबानींच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकं प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणात सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून हा आरोप केला आहे. सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?, असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले आहेत.
कोण आहेत सचिन वाझे?
नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास १६ वर्षांनंतर २०२० मध्ये पोलिस दलात परतले. सचिन वाझे हे १९९० च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे. सचिन वाझे यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यावर ‘जिंकून हरलेली लढाई’ नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली. सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते.