मुंबई (वृत्तसंस्था) समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे व अन्य सार्वजनिक ठिकाणी प्रचंड गर्दी होती. विनामास्क फिरणारे वाढले आहेत, या सर्वांचाच विचार करून पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध घातले जाऊ शकतात. त्यासंदर्भात दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आगामी दोन महिन्यांत कोरोना अक्राळविक्राळ स्वरूप धारण करण्याची शक्यता असून राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी त्याचे संकेत दिले. अर्थात, हे लॉकडाऊन पूर्वीप्रमाणे नसले तरीही लग्न सोहळे, उद्याने, पर्यटनस्थळे, समुद्रकिनाऱ्यासह इतर अनेक गोष्टींबाबत कडक निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातही हा आकडा वाढतो आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विमान, रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे निर्बंध लागू आहेत. २५ नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू असल्याचे राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केले आहे. चाचणी सकारात्मक आल्यास परत त्यांच्या राज्यात पाठवणी करण्यात येईल, तर लक्षणे दिसल्यास कोविड सेंटरमध्ये दाखल करणार आहे.
हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत आणणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात येण्यापूर्वी ७२ तास पूर्वी चाचणी व्हावी. विनाचाचणी प्रवाशांची विमानतळावर चाचणी होईल. त्याचा खर्च प्रवाशालाच करावा लागणार आहे. विमानतळावर चाचणी केल्यानंतर प्रवाशांना घरी जाता येईल. कोरोना अहवाल सकारात्मक आल्यावरच प्रवाशाला माहिती कळवली जाईल. सध्या पुणे, नागपूर, औरंगाबदेत कोरोना रुग्ण वाढत आहेत. पुढील सहा दिवसांत राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा अभ्यास करण्यात येईल आणि त्यानंतर मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.