मुंबई (वृत्तसंस्था) मला कोणताही मोह नाही, मी राजीनामा द्यायाल तयार आहे. परंतु, ज्यांना मी नकोय त्यांनी माझ्या समोर येऊन बोला. समोर येऊन बोललात तर संध्याकाळी देखील राजीनामा देतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून सांगितलं आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या आमदारांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणीही आपल्याला हिंदुत्व सोडलं असं सांगू नये असा इशारा दिला. महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार तेव्हा शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी सांगितल्यावरच आपण मुख्यमंत्रीपद सांभाळलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कोरोना काळात प्रसंग बाका होता. मला प्रशाससनाचा अनुभव नव्हता. कोणीही तोंड देऊ शकलेलं नव्हतं, मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. मला जे करायचं होतं ते मी प्रमाणिकपणाने केलं. त्यादरम्यानच्या काळात जे सर्व्हे होत होते त्यामध्ये देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची गणणा केली गेली. मी आज कोविडचा विषय घेऊन आलेलो नाही. काही मुद्दे आपल्यासमोर येत आहेत. शिवसेना बाळासाहेबांची आहे का? शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे का? मुख्यमंत्री भेटत का नाही? मुख्यमंत्री भेटत नव्हते.
मुख्यमंत्री म्हणजे मी. हे गेल्या काही दिवसांपूर्वी सत्य होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी माझी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरची दोन-तीन महिने हे फार विचित्र होते. मी कुणाला भेटू शकत नव्हते. म्हणून त्या काळात मुख्यमंत्री भेटू शकत नाही ते बरोबर होते. मी माझी पहिली कॅबिनेट मिटिंह ही रुग्णालयातून अटेन्ड केली होती.
शिवसेना आणि हिदुत्वाची घट्ट नाळी आहे. शिवसेना कदापि हिंदुत्वाशी आणि हिंदुत्व शिवसेनेसोबत दूर होऊ शकत नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. म्हणून आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि काही आमदार-खासदार अयोध्येला जावून आले. हिंदुत्वासाठी कुणी काय केलं हे आता बोलण्याची वेळ नाही. शिवसेना कुणाची आहे? काही जण असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत की आता बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. मी असं काय केलंय की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर चालली आहे.
माझ्यासोबत पहिल्या आणि आताच्या मंत्रिमंडळातले जे सहकारी आहे ते बाळासाहेबांच्या काळाचीलच सहकारी आहेत. मधल्या काळामध्ये जे काही मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा. सध्या राज्यात काय चाललं आहे. राज्यातील काही शिवसेनेचे आमदार गायब. गेले कुठे? पहिले सुरतला गेले नंतर गुवाहाटीला गेले. आता त्यातील काही आमदारांचे आम्हाला फोन येत आहेत. मला त्याच्यामध्ये जायचं नाही. काल-परवी जी निवडणूक झाली. त्या निवडणुकींनंतर आमदार हॉटेलमध्ये होते. तेव्हा मी ज्यांना आपण आपलं मानतो, शिवसैनिक मरमर राबतात निवडून देतात आणि आपल्याच माणसाला एकत्र ठेवावं लागतं. मध्येच कुणीतरी गायब होतं. बाथरुमलाही गेलं तरी शंका. अशी लोकशाही मला आवडणारी नाही.
शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिंदे यांना सेनेच्या 45 पक्षाही जास्त आमदारांचं समर्थन मिळताना दिसत आहे. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेनाच हायजॅक केली का? असा सवाल उपस्थित केला जातोय. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी अनेक घडामोडी सुरु होत्या. बंडखोरांना परत बोलवण्याचे शर्तीने प्रयत्न सुरु होते. काही महत्त्वाचे निर्णय देखील घेतले गेले. यामध्ये शिंदे यांचं गटनेता पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तो निर्णय अवैध असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. याशिवाय शिवसेनेकडून प्रतोद देखील बदलण्यात आला आहे. तो निर्णयही शिंदे यांनी तांत्रिक गोष्टींचं कारण देत अवैध असल्याचं म्हटलं आहे. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसमोर येत आपली भूमिका मांडली.