औरंगाबाद (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी केलेल्या बंडाच्या राजकारणामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तमाम शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खरेपणाचं खरंच कौतुक. आमच्यात राजकीय मतभेद असू शकतात पण आज उद्धव ठाकरेंना ऐकल्यानंतर त्यांच्या बद्दलचा आदर आणखीन वाढला. तुमच्या विनम्रतेने तुमच्या पक्षातील सर्व नाराजांना जोरदार चपराक दिली आहे”, असं जलील ट्विटरवर म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना भावनिक साद घातली आहे. “माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद सोडायला तयार आहे. मी आजच वर्षा बंगल्यातून मातोश्रीवर जाण्यास तयार आहे. आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करत आहे. गायब आमदारांनी समोर येऊन माझ्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांना द्यावं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार आहे. कोरोना नसता तर मीच राजीनामा घेऊन गेलो असतो. शिवसैनिकांनी सांगावं मी शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी योग्य नाही, मी शिवसेना प्रमुखपद सोडण्यास तयार आहे. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळ हा माझ्यासाठी गौण आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.