मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोनाची साखळ तोडण्यासाठी ब्रेक दी चैन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास मुभा आहे. मात्र, संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी संचारबंदीची ऐशीतैशी केली. यावरुन आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर कडक भूमिका घ्यावी लागेल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
कडक निर्बंध जरी घातले असले तरी काही आस्थापनांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना कारवाई करताना विचार करावा लागत आहे. प्रत्येकवेळी पोलीस कारवाई करतीलच असं नाही. पण जर कोणी कायदा, नियम मोडत असतील तर पोलिसांना बळाचा वापर करावा लागेल. परंतु आम्ही पोलिसांना संयमाने परिस्थिती हातळण्यास सांगितलं आहे, असं वळसे पटील म्हणाले. यावेळ त्यांनी खाकी वर्दीचा अपमान सहन केला जाणार नाही. जो कोणी असं कृत्य करेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील वळसे पाटलांनी दिला.
यावेळी अत्यावश्यक सेवेला परवानगी दिली आहे. सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवलेल्याने त्यामुळे लोक बाहेर येतात. पण अत्यावश्यक कामासाठी आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांनीच बाहेर यायला हवं असे गृहमंत्री म्हणाले. संचारबंदीचे काटेकोर पालन होईल अशा प्रकारची व्यवस्था करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निर्बंध विनाकारण लावलेले नाहीत ही बाब लोकांनीही लक्षात घेतली पाहिजे असे ते म्हणाले.
पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त त्याबाबत निर्णय घेतील. यासंदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस रस्त्यावर आपल्यासाठी काम करतायत. जीव धोक्यात घालतायत, लोकांनी विनाकारण घराबाहेर पडून कोरोनाच्या वाढीला निमंत्रण देऊ नये असं आवाहन गृहमंत्र्यांनी केले.