मुंबई (वृत्तसंस्था) शेतकऱ्यांचा मोर्चा आज राजभवनावर धडक देणार आहे. मात्र या मोर्चाला आम्ही परवानगी दिलेली नसल्याचे मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वासन नांगरे पाटील यांनी सांगितले आहे. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार दक्षिण मुंबईत मोर्चाला परवानगी देता येत नाही. यासंदर्भात आम्ही मोर्चाशी संबंधित शिष्टमंडळ आणि नेतेमंडळींची भेट घेतली आहे. त्यांना समजावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या शेतीविषयक तीनही कायद्यांना विरोध करत देशातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची तमा न बाळगता, हे कायदे मागे घेण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत महाराष्ट्रातील शेतकरीही काल हजारोंच्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानावर जमले आहेत. राजभवनावर जाण्याची या शेतकरी आंदोलकांची इच्छा आहे. विश्वास नांगरे पाटील हे आझाद मैदानावर गेले. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. ही भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, ‘मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही राजभवनात जाण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र कोर्टाच्या आदेशानं दक्षिण मुंबईत मोर्च्याला परवानगी देता येत नाही, या सर्व कायदेशीर गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना सांगितल्या आहेत’
विश्वास नागरे पाटील म्हणाले की, आंदोलनाला परवानगी नाही. तरीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कडेकोड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ८०० पोलिस कर्मचारी-अधिकारी या ठिकाणी तैनात आहेत. मोर्चाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही. यासोबतच आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे अशाही सूचना आम्ही दिल्या आहेत. तसेच विविध संस्थांनी मास्क पुरवले आहेत.’
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीसांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढून या आंदोलनात सहभागी होत आहेत. सांगलीतील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सांगलीतून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापूरच्या दिशेने येईल. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह शेतकरी यामध्ये सहभागी होतील, असे राजू शेट्टी यानी सांगितलंय. गेल्या जून महिन्यांपासून आम्ही सातत्याने या तिन्ही कृषी कायद्याला विरोध करत आहोत, त्यामुळे कुणाच्या पाठिंब्याची अपेक्षाच आम्ही करत नाहीत, असे म्हणत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची अपेक्षा नसल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलंय. तसेच, विरोधी पक्षांचा आंदोलनातील सहभाग पूर्ण ताकदीनिशी नसल्याने आपण नाराज असल्याचंही शेट्टी म्हणाले.