बोदवड (प्रतिनिधी) सामाजिक समानता साधायची असेल तर लिंग समानता समाजात रुजवावी लागेल असे प्रतिपादन पारलिंगी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच समाजातील ईतर शोषित व वंचित घटकांसाठी संघर्ष करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या शमीभा पाटील यांनी केले.येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील महिला तक्रार निवारण समिति तर्फे “लिंग समानता व विवाहपूर्व समुपदेशन” या विषयावर आयोजीत कार्यशाळेत त्या विचार मांडत होत्या. कार्यशाळा मंगळवार रोजी प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या मार्गर्शनाखाली संपन्न झाली. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्राध्यापक विनोद चौधरी हे होते.
याप्रसंगी लिंग समानता यावर बोलतांना शमिभा पाटील यांनी स्त्री व पुरुष या व्यतिरिक्त अस्तित्वात असणारे ईतर ११ घटकांबद्दल बद्दल सविस्तर माहिती दिली. आपल्या विचार करण्याच्या, जगण्याच्या कक्षेत पारलींगी व्यक्तीचं अस्तित्व आपण गृहीत धरून त्यांना तितक्याच आदराने वागवण्याची व पूर्णपणे मनापासुन स्वीकारण्याची निकड व्यक्त केली. पारंपारिक सामजिक रचनेला फाटा देत समाजातील ईतर घटकांना न्याय, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य देत समानता ते समता आणण्याचं आव्हान त्यांनी केले. सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक घडण ही जात , लिंग हे निकष लावून केली जाते.त्याकडे चौकस बुध्दीने बघून विवेकाने व संवेदनशीलतेने जोपर्यंत समाज वागणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लींग समानता येणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या पारलिंगी मित्र मैत्रिणींना सोबत करण्याची, तसेच न्यायालयाने केलेल्या कायदेविषयक तरतुदी समाजाने अमलात आणण्याची, आपल्यामधील संवेदनशीलता दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगीतले. स्वतःला ओळखून, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व स्वीकारून, टप्प्याटप्प्याने बदल घडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेचा दुसरा विषय मांडतांना मानसशास्त्र विभागाचे डॉ. मनोज निकाळजे यांनी विवाह म्हणजे काय, विवाह संस्थेची स्थापना, विवाहाचे वय, उद्देश, लैंगिक परिपक्वता याविषयी सविस्तर माहिती दिली. विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्त्व सांगताना त्यांनी जोडीदार निवडताना आधीच काही गोष्टी विचारात घेतल्या तर नंतर उद्भवणारे मतभेद कसे टाळता येतील तसेच घटस्फोट थांबवता येतील याबाबतीत मार्गदर्शन केले. समुपदेशामुळे एकमेकांच्या विचारांना स्वीकारण्याची क्षमता तपासली जाऊ शकते तसेच तडजोड कितपत करावी लागेल याचा अंदाज येतो असेही सांगीतले. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. गीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ईश्वर म्हसलेकर यांनी केले तर आभार कंचन दमाडे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. रत्ना जवरास, युवराज ,बाबुराव हिवराळे, वैशाली संसारे, युवराज आठवले, अजित पाटील, समीर पाटील, अतूल पाटील यांनी सहकार्य केले.