अमळनेर (प्रतिनिधी) नागरिकांनी लस घेण्यास नकार दिल्यास त्यांचे रेशनचे धान्य आणि पेट्रोल यासह लाभार्थी योजना बंद करा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अमळनेरात महालसीकरण शिबिराच्या भेटी प्रसंगी दिल्या. तसेच प्रत्येक ठिकाणी डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल मागावा, असेही आदेश त्यांनी दिले.
दोन दिवसांच्या महालसीकरण शिबिरात सुमारे ४८०० नागरिकांचे घरोघरी जाऊन लसीकरण केले. अमळनेर शहरात ७७ हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असताना फक्त ५६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. २१ हजार नागरिकांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही. शासनाचे १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. म्हणून महसूल विभाग, आरोग्य विभाग, नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १० व ११ डिसेंबरला महालसीकरण आयोजित केले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर, संजय चौधरी यांनी गल्लोगल्ली फिरून नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन केले. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या कामाला वेग आला असून नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लस न घेणाऱ्या नागरिकांना रेशन धान्य, पेट्रोल, आदी बाबी देऊ नका
जिल्हाधिकारी राऊत यांनी लस न घेणाऱ्या नागरिकांना रेशन धान्य, पेट्रोल, आदी बाबी देऊ नका, प्रत्येक ठिकाणी डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल मागावा, असे आदेश दिले.
बारा विदेशी नागरिक तालुक्यात दाखल
तालुक्यात दर एक दोन दिवसाआड विदेशातील नागरिक येत आहेत. बारा विदेशी नागरिक तालुक्यात आले आहेत. त्यांचे आधी सात दिवस क्चारंटाईन, नंतर आल्यावर आरटीपीसीआर चाचणी आणि पुन्हा सात दिवस हो बचारंटाईन केले जात आहे. आतापर्यंत एकही विदेशी नागरिक पॉझिटिव्ह आलेला नाही.