नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. फाळणीचे दुःख आणि वेदना आपण कधीच विसरू शकत नाही. या दुःखद गोष्टींची आठवण मनात राहिली तरच स्वातंत्र्याचे मोल समजेल असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळणार असल्याचे जाहीर केले.
देशभरात सध्या भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. मात्र भारताच्या स्वातंत्र्य दिनापूर्वी पाकिस्तान एक दिवस आधी म्हणजे १४ ऑगस्टला त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष ट्विट केलं आहे. फाळणीचं दु:ख विसरु शकत नाही. या फाळणीत बळी गेलल्या लोकांच्या आठवणीत १४ ऑगस्टचा दिवस ‘विभाजन विभीषिका’ स्मृती दिवस म्हणून साजरा केला जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. इंग्रजांपासून भारताला मिळालेलं स्वातंत्र आणि भारताची फाळणी हे एकाचवेळी झालं. या फाळणीवेळी धर्माच्या नावाने हिंसाचार झाला होता. यामध्ये अनेक बळी गेले होते.
दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या जवानांनी भारतीय जवानांना आणि १५ ऑगस्ट रोजी भारताच्या जवानांनी पाकिस्तानच्या जवानांना मिठाईचे वाटप करण्याची पद्धत पंजाबमध्ये अटारी (भारत) – वाघा (पाकिस्तान) सीमेवर पाळली जाते. पण भारतात फाळणी दिन पाळण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच फाळणी या विषयावर वेगवेगळ्या अंगाने चर्चेला तोंड फुटणार आहे. याचे देशाच्या राजकारणावर काय परिणाम होतील यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे.