नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत १२ हजारांनी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ३० हजार ९४१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३५० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३०,९४१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ७० हजार ६४० वर पोहोचली. तर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत काल दिवसभरातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं चित्र आहे. याच कालावधीत कोरोनामुळे ३५० जण मृत्युमुखी पडल्याने कोरोनामृत्यूंचा एकूण आकडा ४,३८,५६० इतका झाला आहे. मृत्युदर १.३४ टक्के इतका आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ७० हजार ६४० पर्यंत वाढली असून ती एकूण कोरोनाबाधितांच्या १.१३ टक्के आहे. तर, एकूण ३,१९,५९,६८० लोक आतापर्यंत बरे झाले असून हे प्रमाण ९७.५३ टक्के इतके आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल ३,७४१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ६९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ६८ हजार ११२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के आहे. राज्यात काल ५२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ५१ हजार ८३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.