नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत आहे. सध्या भारतात ४० हजारांच्या आसपास नव्या कोरोनाबाधितांची दररोज नोंद केली जाते. देशात ४० हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ३९ हजार ३६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. ४१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३९ हजार ३६१ नवीन रुग्ण आढळले. तर ४१६ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल (शुक्रवार) ३९ हजार ७४२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ३५ हजार ९६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात ४ लाख ११ हजार १८९ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यांत देशात ३ कोटी ०५ लाख ०३ हजार १५९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ४ लाख २० हजार ९६७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोटींहून अधिक कोरोना लसींचे डोस
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २५ जुलैपर्यंत देशभरात ४३ कोटी ५१ लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात १८ लाख ९९ हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लसीचे ४५.३७ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. आयसीएमआरनं दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४५ कोटी ७४ लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ११.५४ लाख कोरोना लसींचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांहून अधिक आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात ६ हजार ८४३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर १२३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ५ हजार २१२ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,३५,०२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.