नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भावात काहीशी घट झाली असली, तरी धोका अद्याप टळलेला नाही. देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार १९५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. तर ४९० कोरोनाबाधितांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३९,०६९ लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात ४१ हजार १९५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३९ हजार ०६९ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी पोहोचले आहेत. तर ४९० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या ४४,१९,६२७ लस दिल्या गेल्या आहेत. त्यानंतर लसीकरणाची एकूण संख्या ५२,३६,७१,०१९ झाली आहे. देशात कोरोनाच्या लाटेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी २० लाख ७७ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख २९ हजार ६६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी १२ लाख ६० हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाखांपेक्षा कमी झाली आहे. एकूण ३ लाख ८७ हजार कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज ५,५६० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ हजार ९४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६१ लाख ६६ हजार ६२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ टक्के आहे. राज्यात आज १६३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०१ टक्के झाला आहे. तब्बल ३३ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ६४ हजार ५७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण
बुधवारी केरळमध्ये २३,५०० नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या ३६ लाख १० हजार १९३ झाली आहे. तर ११६ मृत्यूंसह मृतांची संख्या १८,१२० झाली आहे. राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ७५ हजार ९५७ आहे.