नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत ४२ हजार ०१५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३ हजार ९९८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४२ हजार ०१५ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ३ हजार ९९८ रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच एका दिवसात ३६ हजार ९७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना संक्रमित झालेल्यांची एकूण संख्या ३ कोटी १२ लाख १६ हजार ३३७ वर गेली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ४ लाख १८ हजार ४८० रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या ४ लाख ७ हजार १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात ३ कोटी ०३ लाख ९० हजार ६८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. लसीकरणाने देखील देशात जोर पकडला आहे. देशात ४१ कोटी ५४ लाख ७२ हजार ४५५ लसीचे डोस देण्यात आले आहेत.
राज्यातील स्थिती
राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. शिवाय, दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण कोरोनातून बरे देखील होत आहेत. मात्र असे जरी असले तरी देखील अद्यापही कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत रोज भर पडतच आहे. दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही मागील काही दिवसांमध्ये कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ७ हजार ५१० रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ६ हजार ९१० नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, आज १४७ कोरोनबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.