जळगाव (प्रतिनिधी) देशात लोकसभा निवडणुकीची वारे वाहू लागले असून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदली होणार आहे. यामध्ये जिल्ह्यात १३ पोलीस निरीक्षकांसह २७ सहाय्यक पोलीस निरीक्षक व २३ उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ पुर्ण होणार असल्याने देशात मार्च महिन्यात निवडणुकीचा र्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने निवडणुक आयोगाकडून एका जिल्ह्यात तीन किंवा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश पोलीस दलाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जे अधिकारी मूळ जिल्ह्यात सेवा बजावित असून ते बदलीस पात्र आहेत, त्यांची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदली होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा पोलिस दलाच्यावतीने अशा अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाभरातील १३ पोलीस निरीक्षक, २५ सहाय्यक पोलीस निरीक्षक व २३ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील जे अधिकारी बदली पात्र असून त्यांची बदली नाशिक परिक्षेत्रातंर्गतच होणार आहे. ज्या अधिकाऱ्यांनी मूळ रहिवासी असलेल्या ठिकाणी सेवा बजावली आहे त्यांची मुख्यत्वे बदली होणार आहे. बदलीपात्र अधिकाऱ्यांना परिक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये बदली होवून जावे लागणार आहे. अधिकाऱ्यांकडून मागविले तीन पसंतीक्रम जिल्हा पोलिस दलाने बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. बदली होणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडून तीन पसंती क्रमांक मागवले आहेत. तसे पत्र प्रभारी पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी काढले आहे. ज्या अधिकाऱ्यांनी पसंती क्रमांक दिला नाही, त्यांची माहिती निरंक समजण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.
या अधिकाऱ्यांची होणार बदली !
एमआयडीसी पो.नि. जयपाल हिरे, रामानंद नगर पो. नि. शिल्पा पाटील, चोपडा शहर पो.नि. कांतीलाल पाटील, भडगाव पो.नि. राजेंद्र पाटील, नियंत्रण कक्षातील पो.नि. अरुण धनवडे, रामकृष्ण कुंभार, चाळीसगाव पो.नि. ज्ञानेश्वर जाधव, पाचोरा पो.नि. राहुल खताळ, जिल्हा विशेष शाखा विलास शेंडे, पारोळा पो.नि. सुनिल पवार, पहुर पो.नि. सचिन सानप यांच्यासह निलंबीत असलेले किरणकुमार बकाले व राहुल गायकवाड यांची देखील बदली होणार आहे.