नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काबुल विमान तळावर मोठी गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक भारतीय नागरिकही काबूल विमानतळावर अडकून पडले आहेत. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानमधल्या भारतीय राजदूतांना तात्काळ बाहेर भारतात परत आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.
भारतीय वायूसेनेचं C-17 हे विमान आज काबूलहून भारताकडे रवाना झालं आहे. भारताचं हे विमान अमेरिकी सैनिकांच्या संरक्षणात बाहेर काढण्यात आलं. या विमानात जवळपास १४० भारतीय आहेत. यात भारतीय राजदूत आर. टंडन यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना काबूलमधून परत भारतात आणण्यात येत आहे. त्याचबरोबर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनाही लवकरात लवकर भारतात परत आणण्यात येत आहे.
लवकरचं भारतीय नागरिकांना आणले जाईल
भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील परिस्थितीकडे लक्ष देऊन आहोत. यात भारतात परत येण्याची इच्छा असलेल्या भारतीयांची चिंता समजून घ्यावी लागेल, परंतु अशा परिस्थितीत एअरपोर्ट ऑपरेशन सर्वात मोठे आव्हान आहे. यामुळे सर्व प्रकारच्या चर्चा केल्या जात आहेत. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी, अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप देशात आणण्यासाठी विशेष अफगाणिस्तान सेलची स्थापना केली आहे.
काबूलमध्ये जवळपास ५०० भारतीय अडकले आहेत. भारत सरकारच्या C-19 या विमानाच्या साहाय्याने लोकांना बाहेर काढलं जात आहे. सोमवारी साधारण ४६ भारतीय देशात परतले. तर बाकीच्यांना आज बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एका हिंदी वृत्तसंस्थेने याबद्दल दिलेल्या माहितीनुसार, ५०० च्या आसपास अधिकारी तर भारताचे ३०० ते ४०० सुरक्षा जवान सध्या अफगाणिस्तानमध्ये आहेत.