नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय कुलभूषण जाधव यांच्या मृत्युदंडाच्या समीक्षेसाठी एक विधेयक पाकिस्तानच्या संसदेत मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्याने भारताच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.
वृत्तानुसार, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (समिक्षा आणि पुनर्विचार) अध्यादेश असे या विधेकायचे नाव आहे. संसदेत विरोधकांचा विरोध असतानाही हे विधेयक कायदा आणि न्यायसंबंधी समितीने चर्चा करून मंजुर केले. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाली नसती तर पाकिस्तानला आंतराराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाचे पालन न करण्याबद्दल प्रतिबंधांचा सामना करावा लागला असता, असे पाकिस्तानचे न्याय आणि कायदा मंत्री फरोग नसीम संबंधीत समितीच्या चर्चेत म्हणाले आहेत.
















