मुंबई (वृत्तसंस्था) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पॉप स्टार रिहानासह अनेकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होऊ शकत नाही. बाहेरच्यांनी प्रेक्षक म्हणून पाहावं, यामध्ये भाग घेऊ नये. तसेच भारताबाबत काय करायचं ते भारतीय ठरवतील, असा सल्ला सचिननं रिहानाला ट्विटरवरून दिला आहे. रिहानानं शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून ट्विटरवर काही सवाल उपस्थित केले होते.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने पाठिंबा दिल्यापासून देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. रिहानाच्या टि्वटनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आहे. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना भारत सरकारवर टीका केली. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला असला, तरी आता यावरुन दोन गट पडल्याचे चित्र आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांनंतर आता भारताचे महान क्रिकेटपूट सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केले आहे. “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असे टि्वट सचिन तेंडुलकरने केले आहे. सचिन तेंडुलकरने हे टि्वट करताना #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही दिले आहेत.
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत प्रवेश करत शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने दाखल करुन घेण्यास नकार दिला. २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढत दिल्लीत प्रवेश केला. यावेळी दिल्लीच्या सीमेवर तसंच दिल्लीत मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलकांकडून हिंसाचार करण्यात आला होता. याची चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या.