जळगाव (शहाबाज देशपांडे) जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण शिक्षण मिळावे यासाठी कार्यरत असलेल्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा व वस्तीगृहांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन कार्यालय, जळगाव येथे ३ मे २०२५ रोजी ‘आदर्श आश्रमशाळा व वस्तीगृह बक्षीस वितरण सोहळा’ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांना आश्रमशाळा व वस्तीगृह व्यवस्थापन, आधुनिक शिक्षणप्रणालींचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेतलेल्या पुढाकारशील भूमिकेप्रमाणेच डिजिटल शिक्षण उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष सन्मान देण्यात आला.
या बक्षीस वितरण सोहळ्याच्या माध्यमातून चांगले प्रशासन, स्वच्छता, गुणवत्तापूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घेतलेली विशेष मेहनत, क्रीडा, सांस्कृतिक आणि तांत्रिक कौशल्यविकास अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेची दखल घेण्यात आली. यामुळे इतर शाळांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल.
शासकीय आश्रमशाळा विभागात लालमाती (प्रथम), वाघझिरा व सर्वे (द्वितीय), अनुदानित विभागात पिंपळे, ता. अमळनेर (प्रथम), लोहारा, ता. रावेर (द्वितीय), वस्तीगृह विभागात आदिवासी मुलींचे वस्तीगृह, जळगाव (प्रथम) व आदिवासी मुलांचे वस्तीगृह, जळगाव (द्वितीय) यांनी अनुक्रमे मानांकन प्राप्त केले. तसेच डिजिटल शिक्षणासाठी प्रोत्साहनपर बक्षीस चांदसर शासकीय आश्रमशाळेला प्रदान करण्यात आले.
या यशामध्ये मनेश तडवी (मुख्याध्यापक, लालमाती), किशोर महाजन (वाघझिरा), सदासीव पवार (सर्वे), उदय पाटील (पिंपळे), सुनील सपकाळे (लोहारा), अलका दाभाडे (गृहपाल), वासुदेव बच्छे (गृहप्रमुख) आणि भैय्यासाहेब देशपांडे यांचे मोलाचे योगदान आहे. या सर्वांनी पारितोषिके स्वीकृत केली.
बक्षीसाचे स्वरूप प्रमाणपत्र व रोख रक्कम असे होते. प्रथम क्रमांक विजेत्यांना प्रमाणपत्रासह रु. ७५,०००/- तर द्वितीय क्रमांक विजेत्यांना प्रमाणपत्रासह रु. ५१,०००/- धनादेश प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकल्प अधिकारी अरुण पवार व त्यांच्या टीमचा गौरव करण्यात आला.
या उपक्रमामुळे केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढून शिक्षण सुलभ झाले नसून व्यवस्थापनात पारदर्शकतेलाही चालना मिळाली आहे. स्मार्ट क्लासरूम्स, ई-लर्निंग, संगणक प्रयोगशाळा अशा उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिक्षक व गृहपालांना नवे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली आहे.
या यशस्वी उपक्रमामध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, राजेंद्र लवणे, संदीप पाटील, पवन पाटील, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मिलिंद पाईकराव व विश्वास गायकवाड यांचे विशेष योगदान राहिले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आदिवासी विभागाच्या कामाची प्रशंसा करत, भविष्यकाळात अशाच उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. बक्षीस वितरण उपक्रमामुळे जिल्ह्यातील आश्रमशाळा व वस्तीगृहांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.