जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात या आठवड्यात पारा ४५ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला असून काल ४३.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
कडाक्याच्या उन्हामुळे एप्रिल महिन्यातच ‘मे हिट’चा तडाखा जाणवू लागला असल्याने दुपारच्या वेळेस रस्ते निर्मनुष्य होत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १६ जणांना उष्माघाताची लक्षणे असलेले आढळून आले आहेत. जिल्ह्यातील ७५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘उष्माघात कक्ष’ स्थापन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळेस अतिश्रमाचे काम करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.