जळगाव (प्रतिनिधी) लग्नाला जाण्यापुर्वी महिलेने आपले सर्व दागिने फ्रिजर मध्ये ठेवले होते. परंतू घरात कामासाठी येणाऱ्या मोलकरीणीने फ्रिजरमध्ये ठेवलेले साडेतीन लाखांचे दागिने लांबवले. ही घटना १ जानेवारी रोजी आदर्शन नगरातील तन्मय अपार्टमेंटमध्ये उघडकीस आली. महिलेने मोलकरीणीसह तिच्या मैत्रणीवर संशय व्यक्त केला असून याप्रकरणी दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षीका अर्चना हितेंद्र ढुमे (वय ४९) या आदर्श नगरमध्ये वास्तव्यास आहेत. अर्चना ढुमे यांच्या मैत्रीणीकडे लग्न असल्याने दि. ३० डिसेंबर रोजी त्या घराला कुलूप लावून नागपुर येथे लग्नाला गेल्या. यावेळी त्यांनी घराची चावी शेजारी राहणाऱ्या चारुदत्त पाटील यांच्याकडे दिली होती. ढुमे या घरी नसतांना त्यांची मोलकरीन विद्या साळुंखे या चारुदत्त पाटील यांच्याकडून चावी घेवून घरकाम करीत होत्या.
लग्नाहून परतल्यानंतर घटना उघडकीस
दोन दिवसांनतर दि. १ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घरी आल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या शाळेत निघून गेल्या. सायंकाळच्या सुमारास त्यांनी घरातील फ्रिजरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने बघण्यासाठी गेल्या असता, त्यांना मिळून आले नाही. त्यांनी लागलीच त्यांच्या घरी काम करणाऱ्या विद्या सोळुंखे यांना बोलावून दागिन्यांबद्दल विचारले.
दोघ मोलकरणींवर संशय
मोलकरीणीकडे दागिन्यांबद्दल विचारल्यानंतर त्यांनी अपार्टमेंटमधील नागरिकांना दागिन्यांबद्दल विचारणा केली. परंतु त्यांनी काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने लागलीच रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. यावेळी ढुमे यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या मोलकरणींवर संशय व्यक्त केला असून त्यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी चोरलेला ऐवज
७५ हजारांचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले पाच जोड, ७५ हजार सायांचे २५ ग्रॅम वजनाचा लक्ष्मीहार, ९० हजारांचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याची पोत, १५ हजारांची सोन्याची अंगठी, ३० हजारांची १० ग्रॅम वजनाचे ३ सोन्याचे पेंडल, ६० हजार रुपयांचे २० ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली असा एक्यू । ३ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरटयांन चोरून नेला.















