जळगाव (प्रतिनिधी) सालाबादप्रमाणे यंदाही नूतन मराठा महाविद्यालयात प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली “नवसृजन” वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
उद्घाटन समारंभाला नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले आणि सध्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळावर राज्य समन्वयक म्हणून कार्यरत असलेले मा श्री विनोद ढगे यांची उपस्थिती लाभली तसेच बक्षिस समारंभ आणि समारोपीय सत्राला नूतन मराठा महाविद्यालयाचीच माजी विद्यार्थीनी असलेल्या आणि नुकतीच राज्यसेवा परिक्षेत जिल्हा उपनिबंधक म्हणून ज्यांची निवड झालेल्या भारती रविंद्र पाटील यांची उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबतच भावी वाटचालीत यशस्वी भरारी घेता येईल या उद्देशानेच अशा उंच भरारी घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना या स्नेहसंमेलनात बोलविण्याचा दुरदृष्टिकोन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांचा यातून दिसून आला. स्नेहसंमेलनाला महाराष्ट्र गीताने आरंभ झाला तर प्रा रत्नाकर कोळी लिखित तथा डॉ राहुल संदानशिव यांनी गायलेल्या काॅलेज गीताने प्रारंभ करण्यात आला.
कविता,गजल,गायन, नृत्य असे एकापेक्षा एक सरस बहारदार कलाप्रकारातून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्याची छाप सोडली. तीन तास चाललेल्या या बहारदार स्नेहसंम्मेलनाचे सुत्रसंचलन प्रा इम्रान खान आणि प्रा मुक्ती जैन यांनी केले. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांसह महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ एम एस पाटील, समन्वयक डॉ के बी पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ एन जे पाटील आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ राहुलु संदानशिव उपस्थित होते.
उद्घाटन सत्रातील प्रमुख अतिथी म्हणून विनोद ढगे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अशा स्नेहसंमेलनाच्या माध्यमातूनच मी महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळापर्यंत पोहचून याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आज प्रमुख अतिथी म्हणून तुमच्या समोर उभा आहे आणि यात माझ्या अंगी असलेल्या कलेचा जितका वाटा आहे तितकाच माझ्या कलेला वाव देणाऱ्या या महाविद्यालयाचा देखील वाटा आहे अशी प्रेमळ भावना व्यक्त करत, नूतन मराठा महाविद्यालय म्हणजे जळगांव चे सांस्कृतिक केंद्र आहे असा आपल्या मायबाप काॅलेजचा गौरव करुन त्यांनी आपल्या पहाडी आवाजात आणि शाहिरी शैलीत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांनी आपल्या महाविद्यालयातून असे अनेक हिरे आजपावेतो घडले आणि ते मोठ्या अभिमानाने आम्ही नूतन मराठा महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत असे गर्वाने सांगतात तेव्हा आनंदाला सिमा उरत नाही असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ राहुल संदानशिव यांनी आयोजनाची भुमिका स्पष्ट केली तसेच सुत्रसंचलन डॉ आफाक शेख यांनी तर आभार समन्वयक डॉ के बी पाटील यांनी मानले. बक्षीस वितरण आणि समारोपीय सत्रातील प्रमुख अतिथी मा. भारती रविंद्र पाटील यांनी कोणताही क्लास न लावता परिस्थितीवर मात करून कसे यश संपादन केले याबद्दल थोडक्यात संवाद साधत मनोरंजनासोबत ज्ञानार्जन करण्यासाठी देखील तत्परता दाखवली पाहिजे असे सांगून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ एल पी देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाविद्यालयाचे ग्रंथालय अनेक दर्जेदार ग्रंथांनी भरलेलं आहे शिवाय महाविद्यालयाच्या वेबसाईटवर देखील हे सर्व ग्रंथ उपलब्ध असून वेगवेगळ्या दर्जेदार अंक, नियतकालिके आणि जगातील आणि भारतातील प्रत्येक मुख्य भाषेतील वर्तमानपत्रे देखील उपलब्ध आहेत त्याचा आपण लाभ घेवून आगामी काळात अशाच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बनण्याची संधी सोडू नका असे सांगून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मा भारती पाटील यांचे वडील श्री रविंद्र भीला पाटील हे देखील उपस्थित होते. मुलीच्या यशस्वी वाटचालीत त्यांचा मोठा वाटा आहे म्हणून पुष्प गुच्छ आणि मोमेंटो देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. या सत्रात विद्यापीठ आणि महाविद्यालयात प्रथम,द्वीतीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी तसेच, एन एस एस, एन सी सी आणि क्रिडा विभागात विशेष कामगिरी करणाऱ्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संबंधित सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याही सत्राचे सुत्रसंचलन डॉ आफाक शेख यांनी तर आभार उपप्राचार्या डॉ माधुरी पाटील यांनी मानले. स्नेहसंमेलनास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी पुर्णवेळ उपस्थित होते.