मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री कंगना राणावतने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर कंगना मुंबईत येण्यापूर्वीच पाली हिल परिसरात असलेल्या तिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने ऑफिसचे टाळे तोडून कार्यलयाची तोडफोड केली. यानंतर कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करून शिवसेनेवर सडकून टीका केली. तेव्हापासून बीएमसी, शिवसेना आणि कंगना यांच्यात चांगलाच वाद सुरु आहे.
दरम्यान, कंगना आणि बीएमसी या वादात आता पर्यंत पालिकेला 82 लाख 50 हजारांचा भुर्दंड सोसावा लागल्याची माहिती समोर येते आहे. या संपूर्ण प्रकरणात पालिकेची बाजू ज्येष्ठ वकील, वरिष्ठ अधिवक्ता अस्पी चिनॉय मांडत आहेत. या लढ्यासाठी पालिकेने आतापर्यंत तब्ब्ल 82 लाख 50 हजार खर्च केले आहेत. चिनॉय यांनी आतापर्यंत 11 वेळा पालिकेची बाजू मांडली आहे. प्रत्येक तारखेसाठी त्यांनी आकारलेल्या 7 लाख 50 हजार शुल्कानुसार पालिकेला इतकी रक्कम मोजावी लागली आहे.
याच पार्श्ववभूमीवर आता कंगणाने ट्विट करत बीएमसी आणि शिवसेनेवर ताशेरे ओढले आहेत. कंगना म्हणाली कि, “माझे घर बेकायदेशीरपणे तोडण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत 82 लाख खर्च केले आहेत. एका मुलीला त्रास देण्यासाठी पप्पू एवढे पैसे खर्च करत आहेत. आज अशाठिकाणी महाराष्ट्र आहे, हे दुर्भाग्यपूर्ण आहे”. या आशयाचे ट्विट तिने केले आहे. दरम्यान, आता कंगनाच्या या ट्विट नंतर बीएमसी किंवा शिवसेना कोणती भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.