अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने यावर्षी तालुक्यातील अंतुर्ली येथील कार्तिक स्वामी मंदिर कार्तिकी पौर्णिमेला देखील बंद ठेवण्याचा निर्णय मंदिराच्या विश्वस्त मंडळाने घेतल्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी यात्रा देखील बंद राहील.
शासनाने जरी मंदिर उघडण्याची परवानगी दिली असली तरी कोरोनाच्या संसर्गाची भीती आहेच. अंतुर्ली येथील कार्तिक स्वामींचे मंदिर महिला व पुरुषांसाठी कार्तिकी पौर्णिमेच्या आदल्या रात्री पासून दुसऱ्या दिवसाच्या रात्री पर्यंत खुले ठेवण्यात येत असे राज्यभरातून विविध भाविक दर्शनासाठी गर्दी करत असत बोरी नदी काठी मोठी यात्रा भरते यावर्षी २९ नोव्हेंबरला कार्तिकी पौर्णिमा आहे. २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मंदिर उघडे राहण्याची अपेक्षा भाविकांना होती. परंतु नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला मदत म्हणून विश्वस्त मंडळाने मंदिर बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नियमित पूजन व इतर धार्मिक कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संस्थान तर्फे करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांनी यात्रेसाठी व दर्शनासाठी तसेच किरकोळ विक्रेत्यांनीही यंदा गर्दी करू नये असे आवाहन ही अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केले आहे.