मुंबई (वृत्तसंस्था) भाजपकडून राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले जात असल्याची चर्चा होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘मास्टरस्ट्रोक’ भाजपवर भारी पडणार आहे. अजितदादांच्या रणनीतीमुळे खडसे यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे.
राज्यसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या स्ट्रॅटेजीमुळे भाजपचे तीन उमेदवार निवडून आले. फडणवीसांनी केलेला हा चमत्कार विधान परिषदेच्या निवडणुकीतही दिसेल, असा दावा भाजपच्या सर्वच नेत्यांकडून केला जात आहे. आपले पाचही उमेदवार निवडून आणताना भाजपकडून खडसे यांना लक्ष्य केल्याची चर्चा होती. त्यांच्या पराभवासाठी भाजपचे नेत्यांची खलबतं सुरू असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत होत्या. खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यापासून फडणवीसांना लक्ष्य करत आहेत.
यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरेपुर दक्षता घेतल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार अजित पवार यांना भेटल्यानंतरच मतदानाला जात होते. मतदानाची सर्व सूत्र दादांनी हातात घेतली होती. पहिल्या पसंतीचे मत कुणी कुणाला द्यायचे, हे ठरलं होतं. त्यानुसार खडसेंची जागा सुरक्षित करण्यासाठी पक्षाचे दहा मंत्री आणि विश्वासू सहकारी व विश्वासू अपक्ष आमदारांना खडसे यांना पहिल्या पसंतीचे मत देण्यास अजितदादांनी सांगितल्याचे समजते. अजिदादा स्वत: प्रत्येक आमदाराला समजावून सागंत होते.
..त्यामुळे आता खडसे यांचा विजय निश्चित मानला जातोय
अजितदादांनी सर्व गणितं जुळवून आणली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता खडसे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर दुसरे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांनाही अपेक्षित मतदान व्हावे, यादृष्टीने काळजी घेतली आहे. इतर आमदार व मित्रपक्षांची सर्व मतं रामराजेंना मिळावीत, अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा पहिल्या पसंतीच्या मतदानाचा कोटा पूर्ण होईल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना आहे.
राष्ट्रवादीने पाच अधिकची मतं मिळवल्याचीही चर्चा
राष्ट्रवादीने आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा 28 केल्याची चर्चा आहे. विजयासाठी 26 मतांची गरज असली तरी दोघांचा दोन-दोन मतांचा कोटा वाढवण्यात आला आहे. एक-दोन मतं बाद झाली तरी त्यांना धोका होऊ नये, म्हणून ही दक्षता घेतल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीकडे 51 मतं असली तरी मित्रपक्ष व अपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादीने पाच अधिकची मतं मिळवल्याचीही चर्चा आहे.