मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णाकुंज हे सर्वसामान्यांसाठी प्रश्न सोडविण्याचं दरबार बनले असून या दरबारी लवकर प्रश्नांचे निराकरण होत असल्याचे चित्र आहे. आज बुधवार (दि.११ नोव्हेंबर) कोळी बांधव, बँडवाले आणि वारकरी आपल्या विविध मागण्या घेऊन कृष्णकुंजवर गेले आहेत.
आज राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी वारकरी, कोळी बांधव आणि मुंबई ठाणे ब्रास बॅन्ड असोसिएशनच्या लोकांनी गर्दी केली, कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे, यात मंदिर उघडण्याची परवानगी अद्यापही सरकारने दिली नाही, कार्तिकी एकादशी जवळ आल्याने पंढरपूर मंदिर सुरु करावं अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. राज ठाकरेंनी ही समस्या सरकारकडे मांडावी यासाठी मनसेने पुढाकार घ्यावा असं राज ठाकरेंना विनंती करण्यात आली. तेव्हा एकादशी निमित्त वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का? त्यासाठी काय उपाययोजना करायल्या हव्या असं राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला विचारलं.
दरम्यान, सोमवारी मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील कलाकारांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती, ५० टक्के उपस्थितीत नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी ते नाट्य व्यावसायिकांनी परवडणारं नाही, सिनेसृष्टीला कोरोना काळात मोठा फटका बसला आहे, त्यामुळे या क्षेत्राला सरकारकडून मदत व्हावी यासाठी कलाकारांनी राज ठाकरेंकडे समस्या मांडली. लॉकडाऊन काळात विद्यार्थी पालक, केबल व्यावसायिक, जीम चालक-मालक, डॉक्टर्स, मुंबईचे डब्बेवाले, वाहतूकदार, पुजाऱ्यांचे शिष्टमंडळ अशा अनेकांनी राज ठाकरेंकडे समस्या मांडली आणि या समस्या निकाली लागल्याचंही दिसून आलं होतं.
















