धरणगाव (प्रतिनिधी) भारतातील थोर समाजसुधारक – सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने व रक्तदान शिबिर आयोजित करून साजरी करावी. असे आवाहन श्री. संत सावता माळी युवक संघाचे विनायक महाजन यांनी केले.
श्री. संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य, दरवर्षी प्रमाणे यंदाही ११ एप्रिल रोजी भारतातील थोर समाजसुधारक राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व १४ एप्रिल भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरू – शिष्य यांची जयंती जवळ आलेली असुन पुन्हा जगभरासह आपल्या महाराष्ट्रातही कोरोना या विषाणुने मोठे थैमान घातले आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सामाजिक अंतर पाळणे, मास्क लावणे हे कटाक्षाने गरजेचे आहे. परंतु मागील काही दिवसात ज्या प्रकारे रुग्ण संख्या वाढली आहे व रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे.
भारतातील थोर समाजसुधारक सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणाबरोबर सामाजिक आरोग्यालाही अन्य साधारण महत्व आपल्या कार्यातुन दिलेले आहे. तत्कालीन परिस्थितीत पुण्यात प्लेगच्या साथीने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना, प्रसंगी जिवीताचाही विचार न करता नागरीकांचे जीव वाचावे यासाठी फुले कुटुंबीयांचा त्याग व समर्पण हे आजच्या कोरोना महामारीशी लढण्यासाठी आपण सर्वांनी आदर्श व प्रेरणादायी मानावे. ज्या महापुरुषांनी आपल्यावर समाजरक्षणाचे संस्कार घालुन दिलेले आहेत, त्याच महापुरुषांच्या जयंतीदिनी त्यांचे विचार आदर्श मानुन कुठेही गर्दी न करता शासनाचे नियम न मोडता महात्मा ज्योतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु – शिष्यांची जयंती घरात राहुन आपल्या कुटुंबीयासमवेत साधे पणाने साजरी करावी. व संपुर्ण महाराष्ट्रात महारक्तदान शिबिराचे आयोजन करावे.
कोरोना लसीकरण सर्वांनी प्राधान्याने करुन घ्यावे, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींग आदींचे काटेकोर पालन करावे. या सर्व गोष्टींचा गांभीर्य ओळखून योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. आपण सर्वांनी सामाजिक जबाबदारी व कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन विनायक महाजन यांनी केले.
११ एप्रिल ते १४ एप्रिल महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानव, महापुरुष यांच्या जयंती निमित्त महारक्तदान शिबिर याचे आयोजन करून एक वेगळा आदर्श या मार्फत सर्वांकडे पोहचवला पाहिजे. याच बरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा अश्या प्रकारे दोन्ही महापुरुष यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन करत आहे.
श्री.संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ गुलदगड, प्रदेश अध्यक्ष जितेंद्रभाऊ महाजन, जळगाव जिल्हा सल्लागार विनायक महाजन, सर्व धरणगाव तालुका व शहर पदाधिकारी यांच्यावतीने आवाहन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष निलेश रावा महाजन यांनी केले.