जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सम्राट नगर येथे कचरा संकलन केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला विरोध करत मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक तथा नगरसेवक अरविंद देशमुख , प्रकाश बालानी, चेतन शिरसाळे आदींसह अन्य नगरसेवक आणि नागरिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन छेडले. विशेष म्हणजे हे आंदोलन सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांकडूनच झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
एकीकडे महापालिकेत स्थायी समिती व महिला व बालविकास समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया संपत नाही तोच दुसरीकडे भाजप नगरसेवक प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करत असल्याचे चित्र दिसले. सत्ताधारी पक्षातीलच लोकप्रतिनिधींना आंदोलन करावे लागणे ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.
महापौर दीपमाला काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगरसेवकांना पुरेसे विश्वासात घेतले जात नाही का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर नगरसेवकांना समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, तर आंदोलनाची वेळ का आली?, असा सवालही राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
या आंदोलनामुळे सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीची सुरुवात झाली आहे का?, महापौर व नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव आहे का?, तसेच आंदोलनाच्या माध्यमातून महापौरांवरील अप्रत्यक्ष अविश्वास व्यक्त झाला का?, यासारखे अनेक प्रश्न पुढे येत आहेत.
एकूणच, आजच्या आंदोलनाने महापालिकेतील सत्ताधारी राजकारणात अंतर्गत ताणतणाव उघड झाल्याची चर्चा असून आगामी काळात याचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक एकत्र येऊन महापौरांबद्दल मंत्री गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे मपौरांच्या कार्यक्षैली बद्दल तक्रार करणार असल्याचे खात्रीदायक वृत्त हाती आलेले आहे. तर महानगरपालिकेत बाहेरील अदृश्य शक्तींची ताकद वाढल्याची चर्चा दबक्या आवाजात महापालिका वर्तुळात व नगरसेवकांमध्ये जोरदारपणे सुरू असल्याचे कळते.
















