जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या वस्त्यांमध्ये सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. पालिकेने अल्पसंख्यांक घटकासाठी असलेल्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात दखल घेत अल्पसंख्याक घटकाला न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे सदस्य मेमन इलियास इक्बाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात भुसावळ पालिकेला अल्पसंख्याक आयोगाकडून उपलब्ध झालेल्या निधीचा वापर केला नसल्याचा आरोप केला आहे. उर्दू-हिंदी माध्यमाच्या शाळांच्या दुरुस्तीसह विविध सुविधा पुरविण्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. स्मशानभूमी परिसरात सुशोभीकरण केलेले नाही.
‘अ’ दर्जाच्या या पालिकेने मोहंमद अली रोडवरच्या समस्यांकडे कधीही लक्ष दिलेले नाही आणि या परिसरातील शौचालयही बेदखल आहे. डॉ. आंबेडकर पुतळा ते खडका चौफुलीदरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही सोय करण्यात आलेली नाही. पथदिवेही बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे भुसावळमधील अल्पसंख्याक घटकावर पालिकेकडून सातत्याने अन्याय होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
















