मुंबई (वृत्तसंस्था) ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांची मस्ती उतरावयालच हवी, असं राज ठाकरे यांनी सांगितले. मात्र ज्या दिवशी हल्लाखोर फेरीवाला जेलमधून बाहेर येईल, त्याचदिवशी त्याला मनसैनिक चोप देतील. भीती काय असते ते त्याला दाखवून देऊ, असा इशारा राज यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.
पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
जन आशीर्वाद यात्रा, हाणामाऱ्या सुरू, मग सणांवर निर्बंध का?
गेल्या वर्षी दहीहंडी होती. पण साजरी केली नव्हती. गेल्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पी साईनाथ यांचं पुस्तक आहे. तसं ‘लॉकडाऊन आवडे’ सरकारला असं झालं. त्यात हजारो कोटींची कामे वाजवली जात आहे. मोर्चे आंदोलन होऊ देत नाही. त्यामुळे वारंवार दुसरी, तिसरी लाट आणली जात आहे. सर्व गोष्टी सुरू आहेत. यांचे मेळावे सुरू आहेत. राणेंची यात्रा निघाली. त्यांच्यासोबत हाणामाऱ्या सुरू आहेत. भास्कर जाधवच्या मुलाने अभिषेक सुरू केला. त्यांना मंदिरं सुरू आमच्यासाठी नाही. क्रिकेट सुरू आहे. बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी केल्या आहेत. त्यामुळे सणांवरच बंधन का? म्हणून मी सैनिकांना सांगितलं सुरू करा. जे होईल ते होईल, असं ते म्हणाले.