लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा येथे चोरीची एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सुरुवातीला चोरट्यांनी वेल्डिंगच्या दुकानातून हजारो किंमतीच्या मालावर हात साफ केला, मात्र नंतर चोरट्यांनी असं काही भावूक वक्तव्य केलं जे पाहून सगळेच भावूक झाले. या चोरट्यांनी चोरलेली प्रत्येक वस्तू परत केली आणि ज्याच्या दुकानात चोरी केली, त्याची माफी देखील मागितली. सध्या या घटनेची चर्चा सोशल मीडियावर (Social media) रंगली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बांदा जिल्ह्यातील चन्द्रायल गावात राहणारा दिनेश तिवारी गरीब घरातील आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ४० हजार रूपये कर्ज घेऊन वेल्डिंगचं दुकान सुरू केलं होतं. दररोज प्रमाणे २० डिसेंबरच्या सकाळी तो दुकानात पोहोचला तर त्याला धक्का बसला. त्याच्या दुकानाचं लॉक तुटलेलं होतं. दुकानातील सर्व साहित्य चोरी झालं होतं. त्यानंतर त्याने पोलिसांना सूचना दिली. तो पोलीस स्टेशनमध्ये गेला तेव्हा तिथे कुणीही नव्हतं म्हणून तो तक्रार दाखल करू शकला नाही. घटनेच्या दोन दिवसांनंतर त्याला कुठूनतरी समजलं की, त्याच्या दुकानातील चोरी झालेलं साहित्य गावातील एका ठिकाणी पडून आहे. चोर त्याचं साहित्य ठेवून गेले होते. चोरी केल्यावर चोरांना समजलं की, दिनेश तिवारी फार गरीब आहे त्यामुळे त्याना वाईट वाटलं. ते फार इमोशनल झाले होते. त्यामुळे चोरांनी एक चिठ्ठी लिहून दिनेश तिवारीची माफीही मागितली.
चोरांनी चिठ्ठीत लिहिलं की, ‘हे दिनेश तिवारीचं साहित्य आहे. आम्हाला एका व्यक्तीकडून तुझ्याबाबत समजलं. आम्ही केवळ त्याल ओळखतो ज्याने लोकेशन दिलं म्हणाला होता की, तू काही सामान्य माणूस नाही. पण जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा दुःखं झालं. त्यामुळे तुझं साहित्य परत करतो. चुकीच्या लोकेशनमुळे आमच्याकडून चूक झाली.
दुसरीकडे साहित्य परत मिळाल्याने दिनेश तिवारी आनंदी आहे. त्याने सांगितलं की, चोरांनी त्याच्या दुकानातून दोन वेल्डींग मशीन, १ कटर मशीन, १ वजन काटा, १ ग्लेंडर आणि २ ड्रिल मशीन चोरी केली होती. आता चोरांनी माझं सगळं साहित्य परत केलं आहे आणि त्यासोबत एक चिठ्ठीही आहे. ज्यात लिहिलं आहे की, त्यांनी चुकून चोरी केली. तो म्हणाले की, मला माझं साहित्य परत मिळालं मी यातच आनंदी आहे. देवाने माझा रोजगार वाचवला.’