मुंबई ( वृत्तसंस्था) : पत्राचाळ घोटाळ्यात ईडीच्या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख असल्याचे समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळं आता पत्राचाळ घोटाळ्यात कोणत्या माजी मुख्यमंत्र्याचा हात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
ईडीने त्यांच्या आरोपपत्रातून दोन गोष्टी समोर ठेवल्या आहेत. यामध्ये 2006-2007 या काळात एका तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आलं होतं. त्यानंतर यामध्ये 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं त्या चार्जशिटमध्ये म्हणण्यात आलं आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीने आपल्या आरोपपत्रात खुलासा केला आहे की, पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रिंग केली आहे. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रादवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे.