मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथक, दहीहंडी उत्सव आयोजकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे मागील वर्षी मुंबई, ठाण्यासहीत राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. तसेच सर्व गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल असं या बैठकीमध्ये समन्वय समितीने सरकारला सांगितलं.
बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत. पण, आता प्रश्नं आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारालाच प्राधान्यांनं करावा लागेल. आम्ही असा निर्णय घेताना अनेकजण आंदोलन करणार असल्याचं जाहीर करतात. मग, आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा ना.”
“बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षीपासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं. लस घेतल्यावर देखील काही देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. इस्त्रायलनं तर पुन्हा मास्क घालायला सुरुवात केली आहे. अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोटं आहेत. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. आपण जर समजूतीनं वागलो नाही तर धोका अटळ आहे. एकदा हे संकट पूर्णपणे घालवूया. आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही. नीती आयोगानं जे सांगितलंय, ते लक्षात घेतलं पाहीजे. गेल्या दीड वर्षात आपण जी आरोग्य सेवा वाढवली आहे, ती इतर कोणत्याही राज्यानं वाढवलेली नाही.”, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
















