छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू विवाहातील दागिन्यांसह पसार झाल्याची धक्कादायक घटना वैजापूरमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे एजंटांच्या माध्यमातून पिडीत कुटुंबाने मुलीच्या आई-वडिलांना अडीच लाख रुपये देऊन मुलाचे लग्न केले होते.
या संदर्भात एका दैनिकात प्रसिद्ध वृत्तानुसार शहरातील शेटे वस्ती येथील रहिवासी बाबासाहेब शेटे (वय ३०) या शेतकरी युवकाचे नातेवाइकांनी काही एजंटांच्या माध्यमातून लग्न जुळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. अकोला जिल्ह्यातील राजामढी (ता. मूर्तिजापूर) येथील लता देवराव गवई (वय २६) या युवतीसोबत विवाहाचा प्रास्तव एजंटांनी आणला. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी अडीच लाख रुपये मागितले. शेटे यांनी पैसे दिल्यानंतर १६ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे काही नातेवाइकांच्या उपस्थितीत करण्याचे ठरले. त्यानुसार शेटे कुटुंबीयांनी नववधूसाठी सोन्याचे दागिनेही केले होते.
विवाह मोठ्या आनंदात पार पडला. मात्र, आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू लता गवई ही अंगावरील दागिन्यांसह घरातून रफूचक्कर झाली. काही दिवस शोध घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे शेटे परिवाराच्या लक्षात आले. दरम्यान, वैजापूर ठाण्यात या प्रकरणी नववधू बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून तपासाअंती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.