मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई मनपा प्रशासन सुद्धा सतर्क झाले आहे. याचसंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये महत्वाचं भाष्य केलं आहे. राज्यामध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्याचा पुन्हा निर्णय घेतला जाईल का असं विचारण्यात आलं असता अजित पवार यांनी जर तरच्या भाषेमध्ये या प्रश्नाला उत्तर दिलं.
पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती दिली. यावर पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे सांगितलं. “मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला डॉक्टर व्यास सर्व माहिती देतात. जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, राज्यांमध्ये काय चाललंय, राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय चाललंय हे आम्हाला सांगतात. या सर्व माहितीमधून सध्या एक पहायला मिळालं की कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या वाढतेय. मात्र व्हेटिंलेटर, ऑक्सिजन बेडवर फार कमी लोक आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
पुढे बोलताना, “डॉक्टरांचा सल्ला घेऊन बुस्टर डोस घेतला पाहिजे. अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तो घेतला पाहिजे. दोन्ही डोस घेणाऱ्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने तिसरा घेतला पाहिजे,” असंही अजित पवार म्हणाले. त्याचप्रमाणे, “आमची त्यावर नजर आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की मास्क वापरणं बंधनकारक केलं पाहिजे तेव्हा आम्ही लगेच मास्क बंधनकारक करु,” असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर अजित पवारांनी हिंदीमधून वेगवगेळ्या विषयांवर प्रतिक्रिया दिल्या. पत्रकार परिषद संपण्याच्या आधी एका मराठी महिला पत्रकाराने मास्क बंधनकारक करण्यावरुन पुन्हा अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवारांनी काही राजकारण्यांना मास्क न घातल्याने पुन्हा करोनाची लागण झाल्याचा उल्लेख केला.