पुणे (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांची पुण्यात अखेर भेट झाली. पुण्यात दोन्ही राजेंमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली. पत्रकार परिषदेनंतर दोन्ही राजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. “दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, असं संभाजीराजे म्हणाले.
“आम्ही दोघं एकाच घराण्यातील आहोत. दोन घराण्यांचा संबंध नाही. संभाजीराजे यांनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे,” असं उदयनराजे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान यावेळी त्यांनी देशाची पुन्हा फाळणी करायची की नाही याचा विचारा करावा, असं सांगताना आजचे राज्यकर्ते यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी राज्याबद्दल बोलत असून केंद्राला पण लागू होतं. प्रत्येक राज्याला लागू होतं असंही ते म्हणाले. जीआर काढून मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी यावेळी त्यांनी केल.
“आपण जात कधी पाहिलेली नाही, पण आता तर लहानपणाचे मित्रदेखील अंतर ठेवून बोलतात. ही फळी कोण निर्माण करत आहे, तर ते राज्यकर्ते करत आहे. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. आरक्षण द्यायची इच्छाच नसून राजकारण करायचं आहे. व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आम्ही आडवे आलो तर आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार आहे,” अशी भीती उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.
संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा
“मुद्द्यांवर आधारित राजकारण केलं तर लोक पाठिंबा देतील. मुद्दे घेतले जात नाहीत तर समाजाच्या आधारे राजकारण केलं जात आहे. कारण नसताना इतकी मोठी दुफळी निर्माण केली आहे. न्यायालयावर तर माझा विश्वासच नाही,” असं उदयनराजेंनी यावेळी सांगितलं. उदयनराजे यांनी यावेळी संभाजीराजेंनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्यांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे, शेवटी मराठा आरक्षण हेच ध्येय आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
“राज्यकर्त्यांना आतापर्यंत फार मुभा दिली आहे. निवडून आल्यानंतर लोकशाहीतील हे जे राजे आहेत त्यांनाही जाब विचारला पाहिजे. राजेशाही होती तेव्हा असं नव्हतं. लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर ते राजे नीट वागत नसले तर त्यांना आडवा आणि गाढलं पाहिजे असं ठाम मत आहे. त्यांना जाब विचारा आणि त्याची सुरुवात माझ्यापासून करा. प्रत्येक आमदार, खासदाराला विचारलं पाहिजे. किती दिवस लोकांना संभ्रमावस्थेत ठेवणार आहात आणि हा अधिकार कोणी दिला,” असा संतापही उदयनराजेंनी व्यक्त केला.
“दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. म्हणून आपण उदयनराजेंची भेटी घेतली. आमची सविस्तर चर्चा झाली असून बहुतांश अनेक विषयांवर आमचं एकमत आहे. आमच्यात अजिबात दुमत नाही. आम्ही पूर्वीपासून एकमतानं काम करत आलो आहोत,” असं संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं.