मुंबई (वृत्तसंस्था) अनेक आमदार आमच्या संपर्कात असून राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन होऊ शकतं. पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे मोठे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
संजय राऊत यांनी दिल्लीतील निवसास्थानी पत्रकारांशी संवाद साधला. संविधानाची सीमा ओलांडून सुप्रीम कोर्ट निर्णय देणार नाही असा विश्वास वाटतो. त्यामुळे 16 आमदार अपात्र ठरतील अथवा फुटीर गटाला इतर पक्षात सामिल व्हावे लागेल असे संजय राऊत यांनी म्हटले. दुसऱ्या पक्षात विलीन होण्याबाबत अनेक आमदारांची तयारी नाही. त्यामुळे त्यातील अनेकजण पुन्हा येतील. काही जण संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीला यावं लागलं नाही. शिवसेनेचं हायकमांड कायम मुंबईत राहिलं आणि आता मुंबईतच चर्चा होत नाही. दिल्लीतील लोक मुंबईत येऊन शिवसेनेशी चर्चा करत होते. युती करण्यासंदर्भात अमित शाहदेखील मातोश्रीवर आले होते. मित्रत्वाच्या नात्यातून या गोष्टी घडत होत्या. पाच वेळा मुख्यमंत्र्यांना यावं लागत असल्याने आता बहुतेक ते आपला मुक्काम दिल्लीत हलवतात का असंही वाटू लागलं आहे खोचक टोलाही राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला आहे. तसेच सुप्रीम कोर्ट संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील, असा विश्वासही संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यामांशी बोलताना व्यक्त केला आहे.