
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भवाळी, खेडी, खेडगाव, कळमडू, पोहरे, कुंझर आदी गावांमध्ये तसेच शेतांमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून पिके, रासायनिक खते, जनावरे व संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. मंगेश चव्हाण यांनी शनिवारी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.
यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, स्थानिक मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच लोकप्रतिनिधी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आ. मंगेश चव्हाण यांनी पूरग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली तसेच शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या. पोहरे येथे अंगणवाडी सेविका असलेल्या एका महिलेच्या शेतातील संपूर्ण पीक पुरात वाहून गेल्याची व रासायनिक खतांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली. संबंधित महिलेची भेट घेत आ. चव्हाण यांनी तिला धीर दिला. या प्रसंगाने उपस्थित ग्रामस्थही भावूक झाले. दौऱ्यादरम्यान प्रशासनामार्फत पंचनामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली. शासनाकडून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे आ. चव्हाण यांनी सांगितले.
संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन पूरग्रस्त व नुकसानग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. या महापुरात विविध गावातील नदीलगत असणाऱ्या आदिवासी कुटुंबांच्या जवळपास अनेक झोपड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने अनेक कुटुंबांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे. तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्याशी संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे, या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीने २०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक व संसारोपयोगी साहित्याच्या किटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान दिली.














