मुंबई (वृत्तसंस्था) या वर्षी मान्सून (Monsoon) वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, हवामान खात्याचा हा अंदाज काहीसा चुकला असल्याचे चित्र दिसून येत आहे. कर्नाटकात दाखल झालेला मान्सून गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे. त्यामुळे आता 12 ते 13 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होण्याची शक्यात आहे.
अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यानं अगदी हैराण केलं आहे. अशातच सर्वचजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण, राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. यंदा मान्सून लवकर दर्शन देणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण मान्सून मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. काही दिवसांपासून मान्सून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे. मान्सून राज्यात आता तो 12 ते 13 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो 7 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला होता.
राज्यात उष्णतेची लाट
महाराष्ट्रात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून ती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. गोंदियात सर्वाधिक 45.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे.