रायगड (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकारला ६ जूनपर्यंत अल्टिमेटम देणाऱ्या खासदार संभाजीराजे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास १६ जूनपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी किल्ले रायगडावरुन केली आहे.
३४८ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी संभाजी छत्रपती यांनी आंदोलनाची घोषणा केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारेही दिले. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. १६ जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा करतानाच आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला.