मुंबई (वृत्तसंस्था) नाना पटोले आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याने राजीनामा दिला आहे. काल पटोले यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग आला होता. सह्याद्री अतिथीगृहावरून नाना पटोले विधानभवनावर दाखल होत त्यांनी आपला राजीनामा दिला. त्यामुळे आता नवा विधानसभा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
नाना पटोले आज (४ फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. यानंतर नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी त्यांचे आभार मानले. त्यानंतर नाना पटोले थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला. काल बुधवारी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष पद मिळणार अशी चर्चा सुरु झाली होती. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, इतर मंत्र्याची भेट घेऊन नाना पटोले आभार मानणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतरच विधानसभेत येऊन नाना पटोले राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता आज खरी ठरली आहे. आता काँग्रेसचे नवे प्रदेश अध्यक्ष म्हणून नाना पटोले हे असणार आहे. सध्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रदेश अध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले होते. नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी त्यांनीच मागणी केली होती. त्यामुळे काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता होती. मात्र, नाना पटोले हे नवे अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. मात्र, ज्या काँग्रेस नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल, त्याचं आताचं खातं पटोले यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठाकरे सरकारमधील काँग्रेसच्या विद्यमान मंत्र्यालाच उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. म्हणजे त्याच्याकडील आताचं खातं पटोले यांच्याकडे दिलं जाईल आणि त्यामुळे मंत्रिपदाबाबतची खळखळ होणार नाही, अशा प्रकारची काँग्रेसची रणनीती असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडून नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात येईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.