मुंबई (वृत्तसंस्था) पेट्रोल-डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढत्या किमतींवरून नाना पटोले केंद्र सरकावर निशाणा साधत आहेत. आता ‘काँग्रेस पक्ष हा सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेला पक्ष आहे. काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे’, असे नमूद करतानाच देशभरातून नरेंद्र मोदी यांची हवा आता संपली असून काँग्रेसला अनुकूल वातावरण बनले आहे, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.
यवतमाळ व चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे आज पार पडली. यावेळी पटोले बोलत होते. काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जावून काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन कामाला लागा. बुथ कमिट्या अधिक सक्षम करा, समोर कितीही ताकदीचा उमेदवार असली तरी विजय निश्चित आहे, असे आवाहन यावेळी नाना पटोले यांनी केले. काँग्रेस पक्ष हा सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांच्या विकासासाठी कट्टीबद्ध असलेला पक्ष आहे. काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे. देशभरातून नरेंद्र मोदीची हवा आता संपली असून, काँग्रेसला अनुकुल वातावरण आहे. नागपूरचा ५५ वर्षांचा भाजपाचा बालेकिल्लाही विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने खेचून आणला आहे. पुण्याची जागाही काँग्रेसने जिंकली. ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाले आहे. लोकांचा हा विश्वास कायम ठेवून जोमाने काम केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अधिक सोपा होईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक कल्याणकारी योजना राबिवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबिवली. अवकाळीचे नुकसान होताच १० हजार कोटी रुपयांची मदत दिली. मागील भाजपा सरकारपेक्षा जास्त मदत अवघ्या एका वर्षात केली आहे. सरकारने केलेल्या कामाची, विविध योजनांची माहिती गावा-गावात पोहोचवण्याचे काम करा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.