मुंबई (वृत्तसंस्था) भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत मोठी घसरण होत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पाणीपुरवठा, कृषी तसेच मृद व जलसंधारण या तीन विभागांनी एकत्र मिळून काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी अटल भुजल योजनेबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज व घराघरात पाणी देण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे. पाणी पातळी वाढविण्याचे दृष्टीने जलधर पुनर्भरण योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. शिवकालीन पाणी साठवण योजनेचे पुनरुज्जीवन करावे. असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. भूजल पातळी वाढवण्यासाठी जनतेचा सहभाग घ्यावा, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. जनतेमध्ये जलसाक्षरता व जलजागृती निर्माण करावी असेही ठाकरे म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्रपणे बैठक आयोजित करावी अशी सूचना त्यांनी केली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागत असतो. येथील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा ग्रीडसंबंधी प्रस्ताव तातडीने सादर करावा.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राज्यात ठिबक सिंचन पद्धतीचा फायदा अनेक लोकांना होत आहे. त्यातून अनेक लोकांना रोजगारही मिळतो आहे. त्यावर भर देण्याची गरज आहे.
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले,भूजल पातळी वाढविण्याचे दृष्टीने जलपुनर्भरण अतिशय महत्त्वाचे आहे. भूजल पातळी वाढविण्याच्या कामात लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, पुणे चे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.