सोलापूर (वृत्तसंस्था) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने कार्तिकी यात्रेसाठी वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. दोन दिवस पंढरपूरसह परिसरातल्या ११ गावांमध्ये रात्री संचारबंदी लागू करण्यात येणार असल्यांची घोषणा करण्यात आली आहे. २४ नोव्हेंबर रात्रीपासून २६ रात्री १२ पर्यंत कर्फ्यू राहणार आहे.
२६ नोव्हेंबरला कार्तिकी असल्याने २४ पासूनच दोन दिवस पंढरपूरसह परिसरातल्या ११ गावांमध्ये रात्री संचारबंदी लागू करण्यात येणार असल्यांची घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे हस्ते शासकीय महापूजा होणार असून पालख्यांना मात्र मज्जाव करण्यात आला आहे. पंढरपूरला येणाऱ्या बसेस बंद राहणार आहेत. राज्यात पाडव्यापासून मंदिरं दर्शनासाठी खुली केलेली आहे. मात्र गर्दीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वारकरी हे प्रशासनाला कायमच सहकार्य करत आले असून याही वेळी त्यांना सोबत घेऊन कार्तिकी यात्राहीसुरळीतपणे पार पडेल असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे. कोरोना काळात १०० पोलीस अधिकारी, १२०० कर्मचारी, एक एसआरपीएफचे यूनिट आणि ४०० होमगार्ड मिळून एकूण १७०० जण तैनात केले जाणार आहेत. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे मंदिर असून २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कार्तिक एकादशीचा शुभ मुहूर्त आहे.
कार्तिकी एकादशीला देशातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अशावेळी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक आहे. हे पाहता पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पश्चिम भारताच्या दक्षिण प्रांतात भीमा नदी किनारी आहे. विठ्ठल संप्रदायाचे महान संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा हे आहेत. इथे विठ्ठल रुपातील श्रीकृष्णाची पूजा होते.