जळगाव ( प्रतिनिधी ) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे व पर्याय निवडीतील चुकांमुळे काही पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा एकदा ई-केवायसी करून माहिती दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला ठोस व स्पष्ट निर्देश दिले असून, जिल्ह्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांनी आवाहन केले आहे की, ज्यांची ई-केवायसी प्रक्रियेत चूक झाली आहे किंवा ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही, त्यांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. कोणत्याही अडचणी आल्यास थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शासन व प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.*
ई-केवायसी प्रक्रियेत पात्र असूनही एखादी लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, महिला व बालकल्याण विभागाचे श्री. तडवी तसेच संबंधित सर्व विभागांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, पात्र असलेली एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहणार नाही, याची वैयक्तिक जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी. आपल्या पातळीवर आवश्यक यंत्रणा राबवून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी आणि प्रत्येक प्रकरणाचा संवेदनशीलतेने व तत्परतेने पाठपुरावा करावा. तसेच लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी प्रक्रिया राबवणाऱ्या सेवा केंद्र चालक, सीएससी केंद्र तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नम्र पण ठाम आवाहन केले आहे की, “ई-केवायसी करताना पात्र/अपात्र पर्याय निवडताना अत्यंत काळजी घ्यावी. लाडक्या बहिणींची कोणतीही चूक होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घ्यावी. हे काम या माता-भगिनींचे आशीर्वाद घेण्याच्या भावनेने करावे. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान हेच आपले खरे समाधान मानून काम करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.















