मुंबई (वृत्तसंस्था) टाळेबंदीच्या काळातील वीज देयकांपैकी ६९ टक्के देयके जमा झाली असून उर्वरित २१ टक्के देयके लवकरच भरली जातील, अशी माहिती देत देयक प्रलंबित आहे म्हणून कुणाचेही वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. या पार्श्वभूमीवर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुन्हा एकदा ग्राहकांना दिलासा दिला आहे.
राज्यात कोरोनाकाळातील लॉकडाऊन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्राहकांना देण्यात आलेले वाढीव वीज बिल माफ करावे म्हणून राज्य सरकारवर प्रचंड दबाव आहे. या स्थितीत वाढीव बिलांच्या माफीबाबत धोरण ठरवण्यात येईल, अशी घोषणाही ऊर्जामंत्र्यांनी केली होती. परंतु, प्रत्यक्षात बुधवारी या वीज बिल माफीची घोषणा करताना थकीत बिलांबाबतच ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काही सवलती जाहीर केल्या. शिवाय, या सवलती मूळ बिलात न देता त्या बिलावर आकारले जाणारे व्याज आणि दंडाच्या रकमेवर देण्यात आल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुन्हा एकदा ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत कुणाचेही वीज कनेक्शन बिलासाठी कापले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव गुंडाळून ठेवलेला नाही. त्या संदर्भात समिती नेमली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समितीच्या बैठका झाल्या नाहीत, असे सांगत सरकार मोफत विजेची योजना नक्कीच मार्गी लावेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
टाळेबंदीच्या काळात वाढीव वीज देयके आली म्हणून महावितरणकडे ११ लाख ६९ हजार ग्राहकांच्या तक्रारी आल्या. त्यातील ११ लाख २९ हजार ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा केला आहे, असा दावाही त्यांनी केला. वीज ग्राहक हे आमच्यासाठी ईश्वर आहेत, असेही राऊत या वेळी म्हणाले. टाळेबंदीच्या काळात वाढीव वीज देयकाच्या वलयांकित व्यक्तींनी तक्रारी केल्या होत्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तापसी पन्नू, अाशा भोसले, तुषार गांधी यांच्या घरी जाऊन वीज देयकांचा खुलासा केला. त्यांनी तो मान्य केला आणि देयके भरली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.